1या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोश राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्याबरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्याला दिले.
2राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखयाने त्याला नमन किंवा मुजरा करीत नसे.
3तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?”
4राजाचे सेवक त्याला दररोज हेच विचारू लागले तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की, मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले; आपण यहूदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते.
5मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा तो संतापला.
6पण फक्त मर्दखयाला जिवे मारणे त्याला अपमानकारक वाटले. कारण मर्दखयाचे लोक कोण होते, ते त्यांनी हामानाला सांगितले होते, म्हणून अहश्वेरोशाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहूदी लोकांना कसे मारता येईल याचा विचार तो करु लागला.
7राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीच्या हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्या टाकल्या. त्यानुसार अदार हा बारावा महिना निवडला. (त्या काळात अशा चिठ्ठ्यांना “पूर” म्हणत.)
8मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे हिताचे नाही.
9“ जर राजाची मर्जी असल्यास या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी. दहा हजार किक्कार रुपे राजाच्या खजिन्यात आणावे म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातांत देतो.”
10तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहूद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली.
11राजाने हामानास म्हटले, “तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत; तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे.”
12त्यानंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यांस त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठविण्यात आली.राजा अहश्वेरोशच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली.
13जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याचा, बाराव्या महिन्याचा तेरावा दिवशी तरुण व वृध्द माणसे, स्त्रिया मुले अशा सर्व यहूद्यांचा नाश करावा, त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले.
14हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांना तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे.
15राजाच्या हुकूमानुसार सर्व तातडीने निघाले. शूशन राजावाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले.