Bible 2 India Mobile
[VER] : [MARATHI]     [PL]  [PB] 
 <<  Hebrews 10 >> 

1कारण ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.

2जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे कायमचेच शुध्द झाले असते आणि त्यानंतर पापांची भावना नसल्याने दोषी ठरले नसते.

3परंतु त्याऐवजी ते यज्ञ वर्षानुवर्षे पापांची आठवण करून देतात.

4कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.

5म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.

6होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.

7ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.

8वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबदृलची अर्पणे, हयांची इच्छा तुला नव्हती, व त्यांत तुला संतोष नव्हता. (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे करण्यात येतात.)

9मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” दुसरे स्थापावे म्हणून तो पहिले काढून टाकतो.

10देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

11प्रत्येक याजक तर दररोज सेवा करत आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.

12परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले, व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.

13आणि तेव्हापासून 'आपले वैरी आपले पादासन होईपर्यत' वाट पाहत आहे.

14कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.

15पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,

16परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”

17“आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.”

18जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही.

19म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.

20त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वत:च्या देहातून , आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे.

21कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.

22म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली, आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्र्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.

23आपल्याला जी आशा आहे तिला आपण घट्ट धरुन राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.

24आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.

25आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.

26सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.

27पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.

28जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो.

29तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्याला पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?

30कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”

31जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.

32ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली.

33काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशारीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.

34जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला. आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.

35म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ माेठे आहे.

36तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हाला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्हास प्रतिफळ मिळावे.

37कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे; “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.

38माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”

39परतु ज्यांचा नाश हाेईल अशा 'माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी 'विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.


  Share Facebook  |  Share Twitter

 <<  Hebrews 10 >> 


Bible2india.com
© 2010-2024
Help
Dual Panel

Laporan Masalah/Saran