1इस्त्राएलाचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.
2त्याठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनाजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले.
3लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, आमचे भाऊबंद जसे परमेश्वरासमोर मेले तसेच आम्ही मरायला पाहिजे होते.
4“तू परमेश्वराच्या लोकांना या रानात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी अस तुला वाटते का?
5तू आम्हाला मिसर देशातून का आणलेस? तू आम्हाला या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”
6म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
7परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
8तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
9मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली.
10मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय?
11मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
12पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्त्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे ह्या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.
13त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्त्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
14मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्त्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
15खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
16पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.
17कृपाकरून आम्हाला तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
18परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
19इस्त्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. आम्हाला फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हाला तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
20पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हाला आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तिशाली सेना गोळा केली आणि तो इस्त्राएल लोकांशी लढण्यासाठी गेला.
21अदोमाच्या राजाने इस्त्राएल लोकांना त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. आणि इस्त्राएलाचे लोक तोंड फिरवून दुसऱ्या रस्त्याने निघून गेले.
22इस्त्राएलाचे सर्व लोक कादेशहून होर पर्वताकडे गेले.
23होर पर्वत अदोमाच्या सरहद्दीजवळ होता. परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
24अहरोन आता आपल्या पूर्वजांस जाऊन मिळेल. मी इस्त्राएल लोकांना ज्या प्रदेशात नेण्याचे वचन दिले होते त्यात त्याचा प्रवेश होणार नाही. कारण तुम्ही मी मरीबाच्या पाण्याजवळ दिलेल्या आज्ञांचे उल्लघन करून बंड केले.
25आता अहरोनाला आणि त्याचा मुलगा एलाजार यांना घेऊन होर पर्वतावर जा.
26अहरोनाचे खास कपडे त्याच्याकडून घे आणि ते कपडे त्याचा मुलगा एलाजार याला घाल. अहरोन तिथे त्याच्या पूर्वजांकडे जाईल व मरेल.
27मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. मोशे, अहरोन आणि एलाजार होर पर्वतावर गेले. इस्त्राएलाच्या सर्व लोकांनी त्यांना जाताना पाहिले.
28मोशेने अहरोनाचे खास कपडे काढले व ते एलाजाराला घातले. नंतर अहरोन पर्वतावर मरण पावला. मोशे आणि एलाजार पर्वतावरुन खाली आले.
29इस्त्राएलाच्या सर्व लोकांना अहरोन मरण पावला हे कळले. म्हणून त्यांनी तीस दिवस दुखवटा पाळला.